कृष्णा पैठणे, वणी (प्रतिनिधी): ऊन्हा-पावसाची तमा न बाळगता वणी मध्ये दुसऱ्या दिवशी आदिवासी बांधवांचा चक्काजाम सुरुच असुन माल व भाजीपाल्याची वाहतुक करणारी मालवाहु वाहने ठप्प झाली आहे यामुळे वाहन चालकांचे हाल होत आहे तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

शुक्रवार दि. २३ हा आदिवासी बांधवांनी पेसा संदर्भातील विवीध मागण्यांसाठी पुकारलेल्या चक्काजॅम चा तिसरा दिवस होता. दि.२१ रोजी दिंडोरी येथे रास्ता रोको केल्यानंतर काल दि. २२ रोजी आंदोलनाचे स्थळ बदलुन वणी येथील बसस्थानक चौफुलीवर आंदोलन सुरू करण्यात आले. ते आज शुक्रवार दि. २३ रोजी देखील चालुच होते. यात आंदोलकांनी उन्हा पाऊस कसलीही तमा न बाळगता आंदोलन कायम चालु ठेवले. तसेच आंदोलकांसाठी त्याच ठिकाणी चुल पेटवुन जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या आंदोलनामुळे दोन्ही बाजुंना वाहनांच्या रांगा लागल्या असुन महाराष्ट्र-गुजरात राज्यांना जोडणारा महामार्ग ठप्प झाला आहे. यामुळे ह्या दोन राज्यामध्ये होणारी शेतमालासह इतर मालाची वाहतुक ठप्प झाली आहे. बरेचसे मालवाहु कंटेनर रस्त्यात उभे असुन यामुळे मालासह आर्थिक नुकसान होते आहे. तसेच नाशिकहुन सप्तशृंग गडाकडे जाणारा मार्ग देखील बंद आहे. वणी शहरात रास्तारोको असल्यामुळे पंचक्रोशीतुन बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्यांनी घरीच थांबणे पसंत केल्याने बाजारपेठेत शुकशुकाट आहे. यासह राज्य परिवहनच्या बसेस देखील खबरदारीच्या कारणास्तव कमी केल्याने नोकरी व्यवसाय निमीत्ताने रोज ये-जा करणाऱ्या चाकरमाण्यांची गैरसोय झाली आहे. तरी या प्रकरणी लवकरात लवकर तोडगा निघुन सदर आंदोलन स्थगीत व्हावे अशी मागणी आंदोलकांसह सामान्य नागरिकांकडुन होत आहे.