घोटी (प्रतिनिधी) : इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथील एक ३२ वर्षांची महिला पाच दिवसांपासून बेपत्ता झाली होती. या महिलेचा मृतदेह पिंपळगाव येथील बोरीची वाडी परिसरातील जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असूून या महिलेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झूणकाबाई दशरथ भले (वय ३२) असे मृतदेह आढळून आलेल्या महिलेचे नाव असून त्या गेल्या पाच दिवसांपासून बपत्ता असल्याची तक्रार घोटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह शनिवारी दि. २४ रोजी दुपारी तीन वाजता संशयास्पदरीत्या बोरीची वाडी परिसरातील जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे या महिलेचा घातपात झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, मृतदेहाविषयी माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. या भागात सतत पाऊस पडत असल्यामुळे मृतदेह कुजल्याने अवस्था खराब झाली होती. त्यामुळे वैद्यकीय अधिकाºयांच्या पथकाने घटनास्थळीच शवविच्छेदन केले. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे.
