अतिक्रमणामुळे गोविंद नगरचा रस्ता घेतोय निष्पाप नागरिकांचा बळी!
विजय पाटील,
इंदिरानगर (प्रतिनिधी): इंदिरानगर बोगद्याकडून सिटी सेंटर मॉलकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या फोर्च्यूनर गाडीने दिलेल्या धडकेत इंदिरानगर येथील रहिवासी व रचना विद्यालयाच्या शिक्षिका गायत्री संदीप ठाकूर (वय ३८) राहणार अनुश्री अपार्टमेंट, गुरू गोविंदसिंग कॉलेज, इंदिरानगर यांचा मृत्यू झाला या धडकेत एक पुरुष आणि एक महिला जखमी झाले आहे.
या संदर्भात मुंबई नाका पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, शिक्षका गायत्री ठाकूर या गोविंद नगरकडे जाणाऱ्या मनोहर गार्डन शेजारी असलेल्या रसवंतीच्या गाड्यावर आपल्या सहकारी शिक्षकांसोबत ऊसाचा रस पिण्यासाठी थांबल्या होत्या. त्याचवेळी इंदिरानगर बोगद्याकडून भरधाव वेगाने आलेल्या फोर्च्यूनर वाहन क्रमांक (एम एच १४ जे ९००) या गाडीने जोरदार धडकेत गायत्री ठाकूर या बाजूला फेकल्या गेल्या. रसवंतीचा गाडा आणि शेजारी असलेल्या अन्य एका खाद्य पदार्थाच्या गाडीलाही उडवले. त्यांच्या डाव्या खुब्याला गंभीर मार लागल्याने गायत्री ठाकूर आणि अन्य दोन जखमींना गोविंदनगर परिसरातील अपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. डॉ. किशोर बाफना यांनी गायत्री ठाकूर यांना मयत घोषित केले. गायत्री संदीप ठाकूर इंदिरानगर येथील रहिवासी असून त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुली आहेत. या अपघाताला कारणीभूत ठरलेला चालक सौरभ भोपे यांस मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
इंदिरानगर गोविंद नगर ते सिटीसेंटर रोड या मार्गावरील अतिक्रमणामुळे हा अपघाताचा दुसरा बळी ठरला असून या रस्त्यावर ठिकठिकाणी विविध प्रकारच्या व्यवसायिकांनी केलेल्या अतिक्रमणाच्या विळख्याने रस्त्याची रुंदी आकसली आहे. एका बाजूने डिव्हायडर तर दुसऱ्या बाजूने अतिक्रमण या दरीतून वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच असे भान हरपलेले चालक भरधाव वाहन चालवून निष्पाप नागरिकांचा बळी घेतात. यावर मनपा प्रशासन आणि वाहतूक शाखेने संयुक्त मोहीम राबविणे गरजेचे आहे.
अजिंक्य साने, माजी नगरसेवक
