सटाण्यात रिपब्लिकन सेनेचा संताप; मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेचे दहन करत मंत्रीपदावरून हकालपट्टीची मागणी

तुषार रौदळ,
सटाणा (प्रतिनिधी): भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी नाशिक येथील शासकीय कार्यक्रमात राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुल्लेख केल्याच्या निषेधार्थ सटाणा येथे रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र निदर्शन करण्यात आली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांच्या प्रतिमेचे दहन केले आणि त्यांच्या मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली.
नेमका प्रकार काय?
२६ जानेवारी २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित ध्वजारोहण व शासकीय सोहळ्यात गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा व त्यांच्या राष्ट्राप्रती असलेल्या योगदानाचा उल्लेख टाळला. या कृतीमुळे आंबेडकरी जनतेमध्ये आणि संविधान प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करत सटाणा येथे रिपब्लिकन सेनेने आक्रमक पवित्रा घेतला.
तहसीलदारांना निवेदन:
रिपब्लिकन सेनेच्या वतीने बागलाण तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, “ज्या राष्ट्रद्रोह्यास संविधान आणि संविधानाच्या निर्मात्याचे योगदान मान्य नाही, त्याला संविधानानुसार स्थापित झालेल्या मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही.” तसेच, ज्या महिलांनी या घटनेचा जागीच निषेध केला, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा जो प्रयत्न केला, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारा असल्याची टीकाही करण्यात आली आहे.
प्रा. अमोल बच्छाव यांची भूमिका:
रिपब्लिकन सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रा. अमोल बच्छाव यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान नाकारणे ही एकप्रकारे कुत्सित मानसिकता आणि राष्ट्रद्रोही कृती आहे. जनभावना लक्षात घेता गिरीश महाजन यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा.” तसेच, या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भगिनींना प्रशासनाकडून कोणताही त्रास होऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.
उपस्थित पदाधिकारी:
या आंदोलनाप्रसंगी योगेश साळवे, साजन गायकवाड, दिनेश निकम, जय जगताप, मच्छिंद्र काकळीज, कैलास अहिरे, समाधान गरुड, तेजस उशिरे, हृतिक गायकवाड, स्वप्निल गांगुर्डे, राहुल बच्छाव यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेमुळे संपूर्ण बागलाण तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून ठिकठिकाणी निषेध व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!