खुटवडनगर मधील नागरिकांचा महावितरणविराेधात वाढतोय राेष
सातपूर (प्रतिनिधी): आयटीआय पूल ते खुटवडनगर परिसरात बुधवारी (दि. २९) सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विजेच्या लपंडावामुळे वारंवार नागरिकांसह परिसरातील हाॅटेलचालक, लाॅन्स, रुग्णालयांसह खासगी आस्थापनाचालकांची गैरसाेय हाेत असल्याने महावितरणविराेधात राेष वाढत आहे. मुख्य म्हणजे, नागरिकांनी महावितरणच्या तक्रार क्रमांकावर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडली. दरम्यान, सुरभी काॅलनी, खुटवडनगर परिसरात बुधवारी सकाळीदेखील अडीच तास वीजपुरवठा खंडित झाल्याने शालेय विद्यार्थी, पालकांचीही गैरसाेय झाली. महावितरणने दुरुस्ती कामे पूर्वसूचना देऊन करावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत.
