देवळाली कॅम्प: नाशिक तालुक्यातील दारणा पट्ट्यातील नानेगाव येथे शनिवारी पहाटे बिबट्या पिंजरा बंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निष्वास सोडला असला तरी अद्यापही दोन बिबटे या परिसरात मुक्त संचार करीत असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दारणा काठी नानेगाव, शेवगे दारणा, संसारी लहवित, लोहशिंगवे, वंजारवाडी, राहुरी, दोनवाडे, पळसे बेलदगव्हाण या पट्ट्यामध्ये सातत्याने बिबट्याचे वास्तव्य असून जसजसे पाण्याचे प्रमाण कमी होत जाते तस तसे येथील बिबटे नागरी वस्तीकडे भटकू लागतात गेल्या पंधरा दिवसापासून नानेगाव येथील शिंदे, रोकडे, अडके यांच्या मळे परिसरात बिबट्याचे वास्तव्य दिसून येत होते .मनोहर शिंदे यांचे पाळीव कुत्र्यावर गेल्या पंधरा दिवसापूर्वी हल्ला करून त्यास ठार मारण्यात आले होते ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार वन विभागाने मनोहर बबन शिंदे यांच्या गट नंबर 434 मध्ये बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता . शनिवार दिनांक 8 रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास बिबट्या या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने शिंदे यांनी वन विभागाला याबाबतची माहिती दिली त्यानुसार वन विभागाचे अधिकारी विजयसिंह पाटील, अशोक खांजोडे यांच्या टीमने घटनास्थळी येऊन बिबट्याला रेस्क्यू केले व पिंजऱ्यासह नाशिक रोपवाटिकेत हलवण्यात आले बिबट्या जरी जेरबंद झाला असला तरी या परिसरातील आणखीन दोन बिबटे मुक्तपणे संचार करणारे त्यांना देखील जेरबंद करण्यासाठी वन विभागाने खात्री करून त्या बिबट्यांना देखील जेरबंद करण्याची मागणी नाणेगावचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, मनोहर शिंदे, शंकर रोकडे, विष्णू आडके, राजाराम शिंदे आदींनी केली आहे.
