खेळाला जीवनाचा अविभाज्य भाग बनवा: दिलीप दळवी
स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुलांमध्ये मराठा हायस्कूल सटाणा तर मुलींमध्ये पंडित धर्मा पाटील विद्यालय लखमापूर विजयी ठरले. अंतिम विजेते संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
सटाणा (प्रतिनिधी): मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत कर्मवीरांनी केलेल्या त्यागाचे स्मरण म्हणून कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धा सुरू केली असून विद्यार्थ्यांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा व खेळाला जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी यांनी केले, ते येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना.म.सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. महिला संचालिका शालन सोनवणे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. क्रीडा संचालक तथा उपप्राचार्य डॉ. नरेंद्र निकम, प्रा. सुनिता शेवाळे, स्पर्धा निरीक्षक प्रा.विजय ढिकले, प्रा.दिपक दळवी, प्रा. नानासाहेब निकम, प्रा. गणेश वाघ, प्रा.अमित निकम यावेळी उपस्थित होते.
दळवी पुढे म्हणाले की, कबड्डी हा फक्त खेळ नाही; तो चपळाई, शारीरिक क्षमता, संघभावना, एकाग्रता आणि धोरणात्मक विचार यांचा संगम आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही आपल्या मुलांनी अशा पारंपरिक खेळांमध्ये रस दाखवणे म्हणजे भारतीय संस्कृतीचा अभिमान जपण्यासारखेच आहे.
या स्पर्धेत बागलाण तालुक्यातील १४ शाळामधील २८ संघांनी सहभाग घेतला. यात मुले व मुलींचे प्रत्येकी ७ संघ सहभागी झाले. यावेळी क्रीडा शिक्षक प्रणोती चव्हाण, अविनाश वाघ, विनय सोनवणे, एस.के.पाटील, के.एन.वाघ, व्ही.आय.गावीत, एस.व्ही.खैरणार, आबा आहिरे, बी.पी.बागुल यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. प्रफुल्ल ठाकरे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. क्रीडा संचालक डॉ. नरेंद्र निकम, प्रा. दीपक दळवी यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. प्रा.संतोष मते यांनी पंच म्हणून काम पाहिले.
