अंकुश निकम, अंबड (प्रतिनिधी) : श्री गणरायाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्य अन् भक्तीमय वातावरण आहे. सार्वजनिक गणेश मंडळांची केलेल्या आरास आणि देखावे पाहण्यासाठी नाशिककरांची गर्दी होऊ लागली आहे. त्यातच यंदा पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले असल्याने त्यास नाशिककरांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. अंबड येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाने देखील पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला असून त्यानुसार शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच निसर्गाला बाधा होईल किंवा प्रदूषण होईल, अशी कोणतीही सजावट न करता पर्यावरणपुरक सजावट केली आहे.
गत ३५ वर्षांपासून मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच स्पर्धेतील विजेत्यांना शेवटच्या दिवशी बक्षिस देऊन सन्मानित केले जाते.
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात सर्वांनी एकत्र यावे, यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यांच्याच विचारांतून स्थापन झालेले हे मंडळ सामाजिक बांधिलकी जपत वाटचाल करत आहे. येथील नागरिक आपले कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढत दररोज रात्री ८ वाजता एकत्र येऊन श्री गणरायाची आरती करता व त्यानंतर क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात.
