ग्रामीण भागातुन शहरात येण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स, वाहनचालकांकडून वाढीव शुल्काची मागणी!
नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील 500 हून अधिक बस या निवडणूक कामासाठी गुंतलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मतदानासाठी अनेकजणांचा मूळ गावी जाण्याचा बेत असेल तर त्यामध्ये बदल करावा लागणार आहे. कारण मंगळवारी मंगळवारीच ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत. सोमवारी मुक्कामी गेलेल्या अनेक गाड्या परत येताच थेट डेपोत थांबल्या. त्यानंतर दुपारी जिल्ह्यातील विविध मतदार केंद्रावर या बस रवाना झाल्या. मंगळवारी कर्मचाऱ्यासह मतदान साहित्य घेऊन या बस मतदान केंद्राकडे रवाना झाल्या.त्यानंतर बुधवारी मतदान साहित्य व कर्मचाऱ्यांना परत स्ट्राँगरुमपर्यंत या कर्मचाऱ्यांना सोडविण्याची जबाबदारी एसटीवर आली. यामुळे मंगळवारी अनेक ठिकाणच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे बुधवारीही लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातील काही फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. बसेस कमी प्रमाणात असल्याने प्रवाशांना अनेक तास बसस्थानकावर ताटकळत रहावे लागले. अनेकांनी बस नसल्यामुळे खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. तर दुसरीकडे रेल्वेला मोठी गर्दी उसळली होती.
