नाशिक (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील तापमानाच्या पा-यातील घसरण कायम असून, थंडीचा कडाका दिवस आणि रात्रीही कायम आहे. नाशिकमध्येही यंदाच्या हंगामातील नीचांकी १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानातही घट होत असून बुधवारी (दि. २७) कमाल तापमान २७.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. येत्या काही दिवसांत गारठ्यात अजून वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
उत्तर भारतामध्ये थंडीची लाट पसरली आहे. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेशसह बहुतांश राज्यांमध्ये पारा ६ अंशांच्या खाली घसरला आहे. उत्तरेकडील राज्यांच्या हवामानाचा परिणाम नाशिक जिल्ह्यावरही जाणवत आहे. सलग चार दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश भागांत पाºयातील घसरण कायम आहे. निफाडमध्ये ९ अंशांच्या खाली पारा घसरला असून, यंदाच्या हंगामातील ते नीचांकी तापमान ठरले आहे. अवघ्या तालुक्यात गारठ्यात वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना हुडहुडी भरली आहे. द्राक्षबागांसाठी हे हवामान धोकादायक असल्याने बागा वाचविण्यासाठी शेतक-यांची धावपळ सुरू आहे.
नाशिक शहरामध्येही थंडीचा कडाका कायम आहे. बुधवारी दिवसभर हवेत गारवा जाणवत असल्याने शहरवासीयांनी उबदार कपडे परिधान करणे पसंत केले. तसेच थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून त्याभोवती गर्दी केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या अन्य भागांतही थंडीचा तडाखा जाणवत आहे. रब्बी हंगामातील हरभरा, गव्हासाठी हे हवामान पोषक असले आहे. दरम्यान, हिमालयात बर्फवृष्टी सुरू असून वायव्य भारताकडून येणाºया शीतलहरींमुळे येत्या काही दिवसांमध्ये नाशिकसह राज्याच्या तापमानाच्या पा-यात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीमध्ये अजून वाढ होणार आहे.
