‘आरटीई’विषयी खोटी माहिती दिल्यास होणार कारवाई
नाशिक (प्रतिनिधी): शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी एजंटच्या भूलथापांना अनेक पालक बळी पडत असल्याचे प्रकार शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशी खोटी माहिती देणाºयांवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे दिला आहे.
आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश घेताना निकष पुर्ण करण्यासाठी काही पालक खोटी माहिती देत असल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यात निकषामध्ये बसण्यासाठी चुकीचे भाडेकरार दिले जातात. कागदपत्रांसह चुकीचा उत्पन्नाचा दाखला दिला जातो. काही एजंट अशाप्रकारे चुकीच्या गोष्टी करून देत असतात. यामुळे गरजूंना आरटीईअंतर्गत प्रवेश मिळण्यापासून वंचित रहावे लागते. गतवर्षी अशाप्रकारे चुकीची माहिती देऊन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शिक्षण विभागाकडून रद्द करण्यात आले आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रिया ही पारदर्शक आणि आँनलाईन असल्याने पालकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये. तसेच चुकीची कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केली तर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यामुळे पालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
