हरसूल (प्रतिनिधी): चारधाम यात्रा करण्यासाठी गुजरातच्या दिशेने निघालेल्या मध्य प्रदेश राज्यातील भाविकांच्या खासगी बसला अपघात होऊन एक महिला जागीच ठार झाली असून, ३८ जण जखमी झाले आहेत. जखमींना हरसूल पोलिस व स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी हरसूल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पेठ – हरसूल महामार्गावरील खरपडी घाटात शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
मध्यप्रदेश राज्यातील भाविक खासगी ट्रव्हल्सने (एमपी १७ झेडजी ४४३७) चारधाम यात्रेसाठी निघाले होते. गुजरातच्या दिशेने जात असताना बसला अपघात होऊन सुखीबाई सिंग राठोड (वय ६२) जागीच ठार झाल्या, तर ३८ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच हरसूल पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहित मोरे व कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी हरसूल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू असल्याचे डॉ. एस. सी. गांगुर्डे यांनी सांगितले.

