- केंद्र सरकारच्या पत्राने राज्य सरकारकडून शिवजन्मोत्सवाची नवीन सुरूवात!
- मविप्रचे एक ते दीड हजार विद्यार्थी घेणार सहभागी!
नाशिक (प्रतिनिधी): शिवजयंती कशा पद्धतीने साजरी करावी, याबाबत केंद्र सरकारने राज्याला पत्र पाठवले आहे. त्यात शिवजयंतीनिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा काढण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार केटीएचएम व एकलव्य शाळेचे विद्यार्थी बुधवारी (दि. १९) सकाळी ७.३० वाजता शहरातून रॅली काढणार आहे. याप्रसंगी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालणार आहेत. नाशिक महसूल प्रशासन अन्य विभागांच्या सहाय्याने नाशिकमध्ये ही पदयात्रा काढणार असून, यात मराठा विद्या प्रसारक समाजाचे एक ते दीड हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत, तसेच स्थानिक शाळा, कॉलेज, क्रीडा असोसिएशन व क्रीडा संस्था, क्रीडा प्रबोधिनी यांच्या खेळाडूंच्या सहाय्याने क्रीडा विषयक प्रात्यक्षिक पदयात्रेमध्ये सादर करण्यात येणार आहे. ढोलताशा, लेझीम, पांरपरिक वेषभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम, योगा, मल्लखांब, पारंपरिक व ऐतिहासिक बाबींचा या पथकात समावेश असणार आहे.
