नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकांवर शेअर बाजारप्रमाणे भाव लावला जात असल्याचा आरोप करत शिक्षकांना राजकीय बाजारात ओढू नका, असे खा. संजय राऊत म्हणाले. नाशिक दौ-यावर असताना रविवारी (दि. २३) खा. राऊत बोलत होते.
मुख्यमंत्री नुकतेच नाशिकला येऊन गेले, ते कशासाठी येतात, हे सर्वांनाच माहिती आहे, अशी टीकादेखील त्यांनी केली. पदवीधर, शिक्षक वर्गाला राजकीय बाजारात ओढू नका. लोकांना भ्रमित करून मते मागितली जात असताना निवडणूक आयोग बघ्याची भूमिका घेत असल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात भास्कर भगरे यांच्या विरोधात नाम साधर्म्य असणारा भगरे नावाचा उमेदवार विरोधकांनी उतरविला. भास्कर भगरे यांच्या नावाप्रमाणे तिसरी पास भगरे या उमेदवाराच्या नावापुढे सर लावण्यात आले. त्याला पिपाणी चिन्ह दिले. लोकांची फसवणूक करून मत घेण्याचा हा प्रकार झाला. डमी उमेदवाराची पद्धत बंद व्हायला हवी, असे राऊत म्हणाले. दरम्यान, तिन्ही पक्षांचे नेते विधानसभेला २८८ जागांचे वाटप करतील, असेही राऊत म्हणाले.
