कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुप जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सोहळ्याची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन, पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सामूहिक शिवआरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या मंगलप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण वामन येवला यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या पाल्यांचा उत्साह अनुभवत होता.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी साकारलेली शिवकालीन वेशभूषा. मुलांनी डोक्यावर पगडी, कपाळी टिळा आणि मराठमोळा पोशाख परिधान करून जणू लहान मावळ्यांचे रूप धारण केले होते. विद्यार्थिनींनी भगव्या रंगाच्या नऊवारी साड्या, नथ, गजरे परिधान करून शिवकालीन स्त्रीशक्तीचे प्रतीक साकारले. शाळेच्या पटांगणात जणू शिवकाल पुन्हा अवतरल्याचा भास निर्माण झाला होता.
प्रत्येक वर्गातून दोन विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर, स्वराज्य स्थापनेतील संघर्षावर आणि त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वावर आधारित प्रभावी भाषणे सादर केली. अफजलखान वध, तोरणा किल्ल्याचा विजय, स्वराज्य स्थापनेची शपथ अशा ऐतिहासिक घटनांचा उल्लेख करत छोट्या मावळ्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने उपस्थितांची मने जिंकली. टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कोठावदे एस. बी. यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शिवाजी महाराजांच्या जीवनातील संघर्ष, शौर्य, दूरदृष्टी आणि गनिमी काव्याच्या तंत्राचा उल्लेख केला. प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य, संयम आणि बुद्धीच्या जोरावर स्वराज्याची स्थापना कशी केली, याचे सविस्तर विवेचन त्यांनी केले. “महाराजांचे विचार आणि आदर्श आपल्या दैनंदिन जीवनात उतरवणे हीच खरी शिवजयंती आहे,” असे त्यांनी नमूद केले.
माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अमृतकर सर यांनी स्वराज्य उभारणीत सामान्य मावळ्यांचे योगदान अधोरेखित केले. “स्वामीनिष्ठ मावळ्यांच्या निष्ठेमुळेच शिवरायांनी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या. संघटित शक्ती आणि राष्ट्रनिष्ठा यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे,” असे त्यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिता गांगुर्डे, आशा अहिरे, काशिनाथ डोईफोडे, सचिन रौंदळ, शिवम सोनवणे, भारती पवार, चंदन बेडसे, रेखा देसले, जयश्री शेवाळे, नीता सोनवणे, वैशाली म्हसदे, पल्लवी दुर्धवळे, योगिता मोरे, माधुरी राजपूत व नेहा पाटील या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन निकिता सोनवणे यांनी प्रभावी आणि ओघवत्या शैलीत केले, तर विभाग प्रमुख नीता सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी झाली. या जयघोषांनी संपूर्ण सटाणा परिसर दुमदुमून गेला आणि विद्यार्थ्यांच्या मनात स्वराज्याचा अभिमान आणि देशभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली.
