नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पुढील दोन दिवसांत पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या घाटमाथा भागात शुक्रवारी (दि. २) यलो, तर शनिवारी (दि. ३) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे बळीराजाला आणखी दिलासा मिळणार आहे. बुधवारी (दि. ३१) शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या.
गत आठवड्यात जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पश्चिम पट्ट्यातील धरणसाठ्यात वाढ झाली आहे. काही धरणांतून विसर्ग देखील करण्यात आला. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ५० टक्क्यांहून अधिक भरले आहे. दारणा, भावलीसह अन्य काही धरणांतून विसर्ग देखील करण्यात आला. त्यानंतर गत तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी पावसाचा जोर कमी झाला आहे. आता शुक्रवारपासून नाशिक जिल्ह्याच्या घाटक्षेत्रात काही ठिकाणी जोरदार व मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. शनिवारी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडू शकतो. या कालावधीत कमाल तापमान २७-३१ व किमान तापमान २०-२४ अंश सेल्सिअसदरम्यान, तर वाºयाचा वेग २१-२५ कि.मी. प्रतितास राहण्याची शक्यता महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या इगतपुरी विभागीय कृषी संशोधन केंद्रातर्फे वर्तविण्यात आला आहे.
